महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज (१४ ऑगस्ट) स्मृतीदिन. १४ ऑगस्ट २०१२ रोजी विलासराव देशमुखांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या निधनाला आज १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या १४ वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनतेच्या मनात त्यांचं नाव तितक्याच आदराने घेतलं जातं.
वडिलांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे सुपुत्र आणि लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या लाडक्या बाबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“माझा वनवास काही संपला नाही…”
वडिलांच्या आठवणीत नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होणारे रितेश देशमुख यावर्षी पुन्हा एकदा मनातील भावना दाटून आल्याचे दिसत आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,
“तुम्हाला जाऊन १४ वर्ष झाली – माझा वनवास काही संपला नाही.”
रितेश देशमुख यांच्या या साध्या पण खोल अर्थ असलेल्या ओळींनी अनेकांचे डोळे पाणावले आहेत. वडिलांशिवाय गेलेली ही १४ वर्षे म्हणजे जणू एखादा वनवासच होता, अशी भावना त्यांनी या शब्दांतून व्यक्त केली आहे.
सेलिब्रिटींची आदरांजली
रितेश देशमुख यांच्या या भावनिक पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी कमेंट करत दिवंगत विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिल्या आहेत.
विलासराव देशमुख केवळ राजकारणी नव्हते, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता आणि एक खंदा वक्ता म्हणून ते ओळखले जात होते. आज त्यांच्या स्मृतिदिनी संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत असून, रितेश देशमुख यांच्या या भावनिक पोस्टने पुन्हा एकदा सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.




