महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर शहर महानगरपालिकेत सत्ताधारी पक्षाच्या महापौर व उपमहापौर निवडून १७० दिवस पूर्ण झाले. पण लातूरकरांना काय मिळाले? काहीही नाही! हाच सवाल उपस्थित करत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर आक्रमक टिकास्त्र सोडले आहे.
गोजमगुंडे यांनी म्हटले, “या १७० दिवसांत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. एकाही विकासकामास मंजुरी नाही. कोणतीही नवीन योजना कार्यान्वित नाही. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला येत चालली आहे. पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर प्रभावी अंकुश दिसत नाही. शहरातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत आहे.”
ते पुढे म्हणाले, “लातूरकरांना आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष कामांची अपेक्षा आहे. सत्ता आली म्हणून काय झाले? शहर सोडले गेले आहे. रस्ते खचले, विकास थांबला, प्रशासन ढिलाईने चालले. नागरिकांना फक्त आश्वासने आणि भाषणे मिळत आहेत, कामे नाहीत!”
गोजमगुंडे यांच्या या तीव्र शब्दांनी सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लातूरकर आता पाहत आहेत – सत्ताधारी पक्ष केवळ खुर्ची सांभाळण्यातच मग्न आहे की खरोखर शहराच्या विकासासाठी काही करणार आहे का ?




