लातूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी विविध विषयावर पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतली बैठक

 

 

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर शहरातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्याच बरोबर त्यांना गरत पडल्यास अदययावत यंत्रणेव्दारे सर्व प्रकारच्या वैदयकीय सोयीसुविधा आणि उपचार मिळावेत यादृष्टीने महापालिका, विलासराव देशमुख वैदयकीय महाविदयालय यांच्या सहकार्याने आणि खासगी संस्थेच्या पूढाकारातून संयुक्त उपक्रम उभारण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज सोमवार दि. 31 जानेवारी रोजी लातूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि नियोजन समितीच्या सदस्यांसह संयुक्त बैठक घेऊन कबाले वाटप, सौर ऊर्जा निर्मीर्ती, शहर बस वाहतुक मधून महिलांसाठी मोफत प्रवास, गाळेधारकांची भाडेवाढ, ट्राफीक सिग्नल, कचरा व्यवस्थापन या विषयाच्या अनुषंगाने आढावा घेतला यावेळी ते बोलत होते.

पूढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, लातूर शहरात महापालिकेच्या वतीने मोहल्ला क्लिनीक उभारण्यात येणार आहे, या कामात विलासराव देशमुख वैदयकीय महाविदयालयाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यासोबतच खासगी संस्थेच्या पूढाकारातून संयुक्त भागीदारी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांचा आरोग्य विमा काढण्याचे नियोजन आहे असे त्यांनी म्हटले आहे.

लातूर शहरातील झोपडपटटीधारकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी संबंधित विभागाने कबाले वाटपाची मोहिम हाती घ्यावी, कबाले वाटपातील अडचणी दूर करण्यासाठी मनपा व तहसिल कार्यालयाने संयुक्तरीत्या राजस्व अभियान राबवावे. कुष्ठधाम परिसरात पायाभुत सुविधा उभारण्यासाठी राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवावा. मनपाला विजेच्या बाबतीत स्वंयपूर्ण करण्यासाठी सौरउर्जा प्रकल्पाची त्वरीत उभारणी करावी, शहराच्या नवीनवस्तीमध्ये विज जोडणी देण्यासाठी महावितरणने मोहिम राबवावी, शहरातील घरावरून जाणाऱ्या

धोकादायक विज वाहीन्या त्वरीत हटवाव्यात, शहर वाहतुक बसमधून महिलांना मोफत प्रवास योजना पंधरा दिवसात कार्यान्वित करावी, शहरातील सर्व सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणेने तातडीने कार्यावाही करावी, छत्रपती चौक, बसवेश्वर चौक, बाभळगाव चौक, गरूड चौक, नविन रेणापूर नाका, रेल्वे मार्ग चौक यासह नवीन पॉइंट निश्चीत करून सिग्नल बसवावेत. ट्रॅव्हल्स व भाडयाने चालणाऱ्या वाहनासाठी स्वतंत्र वाहनतळ उभारवेत, बांधकाम परवाने देतांना पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी, रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करून वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावावी, सर्व्हिसरोड मोकळे करून घ्यावेत आदी निर्देश या बैठकी दरम्यान दिले आहेत.

या बैठकीला महापौर विक्रात गोजमगुंडे , उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नियोजन समितीचे सदस्य श्रीशैल उटगे, ॲड. किरण जाधव, समद पटेल, विजय देशमुख अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, मनपा आयुक्त अमन मित्तल, उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसिलदार स्वप्नील पवार यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी मनपाचे अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी मनपा स्थायी समिती सदस्य परिवहन समिती सदस्य उपस्थित होते

बैठकीतील मुद्दे
1) कबाले वाटपातील अडचणी दूर करण्यासाठी राजस्व अभियान राबवावे.
2) मनपाच्या सौरउर्जा प्रकल्पाची त्वरीत उभारणी करावी
3) नवीन वस्तीमध्ये विज जोडणीसाठी महावितरणने मोहिम राबवावी
4) घरावरून जाणाऱ्या धोकादायक विज वाहीन्या त्वरीत हटवाव्यात
5) शहर वाहतुक बस महिलांना मोफत प्रवास योजना त्वरीत सुरू करावी
6) शहरातील सर्व सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करावी
7) ट्रव्हल्स व भाडयाने चालणाऱ्या वाहनासाठी स्वतंत्र वाहनतळ उभारावेत
8) बांधकाम परवाने देतांना पार्कीग व्यवस्था अनिवार्य करावी
9) रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करून वाहतुक व्यवस्थेला शिस्त लावावी

 

Recent Posts