BJP च्या महिला सशक्तीकरणाच्या घोषणा कागदावरच ? लातूर भाजपमधे महिला नेत्यांवर अन्याय सुरूच आधी डॉ.अर्चना ताई आणि आता श्वेता ताई

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर भाजपमध्ये पक्षातील महिला नेत्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.  डॉ. अर्चना ताई चाकूरकर यांच्याकडून प्रभारी पद काढून घेण्यात आले आणि आता माजी नगरसेवक असलेल्या श्वेता लोंढे या महिला उमेदवारांचे तिकीट नाकारण्यात आल्याने भाजपच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

पक्षात सक्रियपणे काम करणाऱ्या आणि जनाधार असलेल्या महिला नेत्यांना सातत्याने संधी नाकारली जात असल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या घोषणा केवळ कागदापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत का?” असा सवाल आता खुलेपणाने उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, श्वेता लोंढे या चालू नगरसेवक असूनही त्यांचे तिकीट कापण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वीही डॉ. अर्चना चाकूरकर यांच्याबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे पक्षाच्या अंतर्गत धोरणावर टीका झाली होती.

या घडामोडींमुळे भाजप नेतृत्वाने महिला नेत्यांबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आता पक्षांतर्गत व राजकीय वर्तुळातून होत आहे. अन्यथा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Recent Posts