महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – एकुर्गा भागातून निवडून गेलेल्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, निष्क्रिय काँग्रेसला मतपेटीतून धडा शिकवा आणि एकुर्गा जिल्हा परिषद गटात परिवर्तन घडवा, असे आवाहन भाजपाचे नेते आमदार रमेश कराड यांनी केले. भाजपा उमेदवारांना आशीर्वाद द्या, येत्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विकासाचे एकही काम शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मात्र, हीच आश्वासने आता मतदारांच्या रोषाचा विषय ठरत आहेत. आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर गेल्या दीड वर्षांत रमेश कराड यांनी एकुर्गा भागात एकही अधिकृत भेट दिली नाही. केंद्र किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून एकही ठोस विकासकाम या भागात आणले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. त्यामुळे “आता जिल्हा परिषद निवडणुकीत केवळ घोषणा करून काय साध्य होणार?” असा थेट सवाल मतदार विचारत आहेत.
उलट, लातूर ग्रामीण मतदारसंघात आमदार रमेश कराड यांनी नेमकी कोणती विकासकामे केली, किती निधी आणला, कोणती कामे पूर्ण झाली याचा जाहीर हिशेब मतदारांसमोर मांडावा, अशी मागणी जोर धरत आहे. केवळ भाषणांतून आश्वासने देण्यापेक्षा आमदारकीच्या काळातील कामगिरी सांगावी, अन्यथा मतदार योग्य तो निर्णय मतपेटीतून देतील, असा इशाराही एकुर्गा भागातील मतदार देत आहेत.





