महाराष्ट्र खाकी (निलंगा / विवेक जगताप ) – पोलीस स्टेशन कासार शिर्शीच्या उत्कृष्ट तपासाला मिळाले यश; तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा गंभीर गुन्ह्यांमध्येही शास्त्रशुद्ध, काटेकोर आणि भक्कम तपासाच्या बळावर न्याय मिळवता येतो, याचे उत्तम उदाहरण पोलीस ठाणे कासार शिर्शीने पुन्हा एकदा समोर आणले आहे. उस्तुरी येथील खून प्रकरणात मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, निलंगा येथील माननीय एस. बी. पवार यांनी दि. ९ जुलै २०२६ रोजी दिलेल्या निकालात आरोपी बसवराज अन्नप्पा बिराजदार (४८), सुनील अन्नप्पा बिराजदार (३३) आणि लखन अन्नप्पा बिराजदार (३४, सर्व रा. उस्तुरी) यांना दोषी ठरवून जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून) व १०९ अन्वये दाखल होता. न्यायालयाने आरोपींना कलम १०३ अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी १०,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त कारावास), तर कलम १०९ अंतर्गत ७ वर्षे सक्तमजुरी व ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास) अशी शिक्षा ठोठावली.
प्रभावी तपासाचे कौतुक
या यशाचे मुख्य श्रेय जाते सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या अत्यंत व्यावसायिक आणि मेहनती तपासाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायटर पोलीस कॉन्स्टेबल १६०६ मस्के आणि पोलीस कॉन्स्टेबल १८६८ आबासाहेब इंगळे यांनी उत्तम कामगिरी केली. पुरावे गोळा करणे, साक्षीदार तयार करणे आणि न्यायालयासमोर भक्कम केस उभी करण्यात त्यांच्या टीमने अप्रतिम कौशल्य दाखवले.
न्यायालयीन पैरवीत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता के. व्ही. पंढरीकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर पैरवी अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल ४९९ आय. डी. चेळकर यांनी उत्कृष्ट समन्वय साधला. पोलीस ठाणे कासार शिर्शीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गर्जे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया यशस्वी झाली.
न्यायव्यवस्थेचा विश्वास वाढवणारा निकाल
हा निकाल केवळ तीन आरोपींना शिक्षा झाल्याचा नाही, तर गंभीर गुन्ह्यांमध्येही पोलीस आणि न्यायालय एकत्रितपणे काम केल्यास दोषींना कठोर शिक्षा होऊ शकते, हे स्पष्ट करणारा आहे. स्थानिक जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवणारा आणि कायद्याच्या राज्याचा सन्मान वाढवणारा हा निर्णय आहे. पोलीस स्टेशन कासार शिर्शीच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अशा समर्पित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे समाजात न्याय आणि सुरक्षा यांचा विश्वास अधिक दृढ होतो.




