महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – स्वतःच्या मालकीचे बैल असतानाही न्यायालयाचे आदेश हातात घेऊन महिनोन्महिने गोशाळेच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारावे लागणाऱ्या दोन शेतकऱ्यांच्या व्यथेने एकदा फिरकी उडवली आहे. परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेने न्यायालयाच्या स्पष्ट आदेशाला साफ नाकारत शेतकऱ्यांच्या पाच बैलांना गहाण ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेणापूर तालुक्यातील शेतकरी बळीराम नारायण भालेराव आणि दिनेश आबासाहेब कातळे यांच्या मालकीचे पाच बैल प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गोशाळेत ठेवण्यात आले होते. न्यायालयाने जनावरांच्या देखभालीचा खर्च जमा करून बैल तात्काळ परत देण्याचे दोनदा स्पष्ट आदेश दिले, तरीदेखील गोशाळा व्यवस्थापनाने हट्ट धरला आणि अतिरिक्त पैशांची लालसा लावत बैल परत देण्यास साफ नकार दिला.
न्यायालयाचा आदेशही धुडकावून गोशाळा व्यवस्थापकांच्या या मनमानी आणि कायद्याची खिल्ली उडवण्याच्या वृत्तीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतीकामासाठी बैलांची निकड भासत होती. शेवटी त्यांनी लातूर युवासेनेचे अध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी आणि भारतीय किसान युनियनचे मा.मराठवाडा अध्यक्ष नेहरू देशमुख यांची दारात धाव घेतली. दोन्ही नेत्यांनी तात्काळ या प्रकरणाला गती दिली. त्यांनी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन संपूर्ण हकीकत सविस्तर मांडली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी प्रकरण गांभीर्याने घेत रेणापूर पोलीस स्टेशनला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक इगे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी थेट गोशाळेत धडक देऊन न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली आणि शेतकऱ्यांचे पाचही बैल परत मिळवून दिले.
या प्रकरणात पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा क्र. ११४/२०२६ दाखल करण्यात आला होता. गोशाळा व्यवस्थापनाने न्यायालयाचा आदेश न मानल्याबद्दल कायद्याची पूर्ण कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
शेतकरी बळीराम भालेराव आणि दिनेश कातळे यांनी पावसाळ्यात बैल परत मिळाल्याने आनंद व्यक्त करत कुलदीप सूर्यवंशी, नेहरू देशमुख, पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि निरीक्षक सुधाकर देडे यांचे मनापासून आभार मानले. गोशाळेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट आणि मनमानी आता चालणार नाही. न्याय मिळवण्यासाठी संघटनांचा आणि प्रशासनाचा पाठिंबा मिळाल्याने दोन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला अशी भावना दोन्ही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.



