महाराष्ट्र खाकी (जालना / विवेक जगताप ) – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची संवेदनशून्यता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. प्रकृती खालावत चालली असतानाही सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस हालचाल किंवा दखल घेतली गेलेली नाही. सरकारची ही टोलवाटोलवी आणि बघ्याची भूमिका पाहून आता राज्यभरातील मराठा समाज तीव्र आक्रमक झाला असून, संतापाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.
जरांगे पाटलांच्या प्रकृतीची चिंता आता संपूर्ण महाराष्ट्राला सतावत असून, सरकारच्या विरोधात मराठा बांधवांमध्ये प्रचंड रोष उसळला आहे. अनेक जिल्ह्यांत सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरत आंदोलनांचा वणवा पेटला आहे. काही ठिकाणी आक्रमक आंदोलकांनी रास्ता रोको केला, तर काही ठिकाणी टायर जाळून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. “सरकारला अजून किती जणांचे जीव घ्यायचे आहेत?” असा संतप्त सवाल यावेळी आंदोलकांकडून उपस्थित केला जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही बरे-वाईट झाले, तर संपूर्ण महाराष्ट्रभर जनक्षोभ उसळेल आणि संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा स्पष्ट इशारा समाजबांधवांनी दिला आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता, बीड जिल्ह्यात कडक बंदची हाक देण्यात आली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.




