Last Updated:
Kerala CM : काँग्रेसने यंदा नाव घोषित करताना धक्कातंत्राचा वापर केला. केरळममध्ये १० वर्षानंतर काँग्रेसच्या हाती सत्ता आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी चांगलीच चुरस होती.

नवी दिल्ली: काँग्रेसने केरळम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने यंदा नाव घोषित करताना धक्कातंत्राचा वापर केला. केरळममध्ये १० वर्षानंतर काँग्रेसच्या हाती सत्ता आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी चांगलीच चुरस होती. केरळमच्या मुख्यमंत्रीपदी व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) आणि खासदार के.सी. वेणुगोपाल हेदेखील अगदी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, अंतिम टप्प्यात ते मागे पडले. वेणुगोपाल हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटचे विश्वासू मानले जातात. सुरुवातीला खासदार के. सी. वेणुगोपाल यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता. तर, दुसरीकडे डाव्या आघाडीच्या सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणारे व्ही. डी. सतीशन यांच्याही नावाला काहींनी पसंती दिली. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकी काँग्रेस हायकमांडने व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
युडीएफच्या विजयाचे शिल्पकार…
विधानसभेत केवळ आरोप न करता पुराव्यानिशी आणि आकडेवारीसह बोलणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. २०२६ च्या निवडणुकीत विखुरलेल्या विरोधकांना एकत्र आणून १०२ जागांपर्यंत नेण्याचे श्रेय त्यांच्या रणनीतीला दिले जाते. क्लिष्ट विषय सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे. मे २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने १०२ जागांसह मिळवलेला विजय हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सुवर्णक्षण मानला जात आहे.
कोण आहे व्ही. डी. सतीशन?
सतीशन यांनी आपला राजकीय प्रवास विद्यार्थी दशेत NSUI मधून सुरू केला. तळागाळातून काम करत त्यांनी आपली पकड मजबूत केली. सलग सहा वेळा आमदार राहिले आहेत. २००१ पासून आजवर (२००१, २००६, २०११, २०१६, २०२१ आणि २०२६) ते परवूर मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले. २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या काळात त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सत्ताधाऱ्यांना अनेकदा अडचणीत आणले. विशेषतः आर्थिक मुद्द्यांवर त्यांनी केलेली मांडणी आजही चर्चेत असते.
सतीशन यांच्या कार्यशैलीत त्यांच्या उच्च शिक्षणाचा मोठा वाटा आहे. त्यांनी केरळ लॉ अकादमीतून LLB आणि शासकीय विधी महाविद्यालयातून LLM पूर्ण केले आहे. राजकारणात पूर्णवेळ येण्यापूर्वी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात १० वर्षे वकिली केली, ज्यामुळे त्यांना कायद्याच्या तांत्रिक बाजूंची उत्तम समज आहे. त्यांनी MSW (सोशल वर्क) मध्येही पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, जे त्यांच्या समाजकार्यातील कामात दिसून येते.
New Delhi,Delhi
May 14, 2026 12:12 PM IST
Kerala CM : काँग्रेसचे धक्कातंत्र, केरळमच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला, चर्चेतल्या नावावर फुली, कोणाला मिळाली संधी?




