महाराष्ट्र खाकी (पिपंरी चिंचवड / विवेक जगताप ) – हिंजवडीच्या समस्यांवर शासनस्तरावर ठोस तोडगा काढणार: आमदार शंकर जगताप यांचा नागरिकांना शब्द दिला आहे. हिंजवडीतील वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता थेट राजकीय पातळीवर गांभीर्याने हालचाली सुरू झाल्या आहेत. येथील नागरिकांच्या आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत, आमदार शंकर जगताप यांनी नुकतीच या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट दिली आणि आंदोलकांशी सविस्तर संवाद साधला.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांना रोजगार देणारे हिंजवडी हे देशातील एक अग्रगण्य आयटी हब आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत येथे वाढलेली वाहतूक कोंडी, खड्ड्यांचे साम्राज्य आणि प्रवासातील नाहक त्रास यामुळे हजारो कर्मचारी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातूनही दररोज मोठ्या संख्येने नागरिक कामासाठी हिंजवडीत येतात, त्यामुळे हा केवळ एका परिसराचा प्रश्न नसून आपल्याच कुटुंबांच्या दैनंदिन जगण्याचा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान नागरिकांनी आणि आयटी प्रोफेशनल्सनी त्यांच्या समस्यांचे सविस्तर निवेदन आमदार जगताप यांना सुपूर्द केले. या सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेत, केवळ कागदी घोडे न नाचवता किंवा वरवरची आश्वसने न देताप्रत्येक प्रश्नावर शासन स्तरावरून ठोस आणि कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून हिंजवडीतील रस्त्यांचा कायापालट करणे, ट्रॅफिक मॅनेजमेंट सुधारणे आणि प्रवासाचा वेळ कसा कमी होईल यासाठी तातडीने पावले उचलली जातील. या लढ्यात नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा ठाम विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला आहे. हिंजवडीच्या विकासाचा हा प्रश्न आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहे.




