महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप ) – विश्वासघाताचा कळस: ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांचा हल्लाबोल सत्तेसाठी खोट्या घोषणा, सत्ता मिळताच बहिणींना लांब, सत्तेच्या राजकारणासाठी कोट्यवधी महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे आमिष दाखवण्यात आले, मात्र सत्ता हातात येताच याच लाडक्या बहिणी सरकारला नकोशा झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी या मुद्द्यावरून फडणवीस सरकारवर अतिशय आक्रमक शब्दांत घणाघाती टीका केली आहे.
आकडेवारीचा खेळ आणि महिलांचा विश्वासघात
या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या चक्क २.४८ कोटींवरून थेट १.६५ कोटींवर आणण्यात आली आहे. याचा अर्थ सरळ सरळ तब्बल **९२.१० लाख महिलांच्या नोंदी रद्द** करण्यात आल्या आहेत. योजना जाहीर करताना, महिलांकडून फॉर्म भरून घेताना आणि कागदपत्रे तपासताना ही पात्रता पडताळणी का केली नाही? असा सणसणीत सवाल वर्पे यांनी विचारला आहे.
“तेव्हा बहिणींची संख्या वाढवून सत्तेची गणिते साधायची होती म्हणून आश्वासने आणि आमिष दाखवले. सत्ता मिळाल्यानंतर मात्र पात्रतेच्या नावाखाली लाखो महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला. ही केवळ आकडेवारी नाही; हा लाखो महिलांचा विश्वासघात आहे.” — रविकांत वर्पे
सत्तेवर येण्यापूर्वी महिलांना विश्वासात घेऊन मतांचे राजकारण करायचे आणि निवडणूक संपताच नियम व पात्रतेचा बडगा उगारून लाखो भगिनींना वाऱ्यावर सोडायचे, हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याची भावना महिला वर्गातून व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर सरकार नेमकी काय भूमिका घेणार आणि वगळलेल्या महिलांना न्याय मिळणार का? , हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




