महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – रागिणी यादव यांनी लातूर महानगरपालिका च्या महासभेत आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घाम फोडला. “सभागृहातील माझा आवाज हा लातूर शहरातील प्रत्येक महिलेच्या हक्काच्या निधीसाठी आहे… माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत मी खाली बसणार नाही!” असा इशारा देत त्यांनी सभागृहातच जोरदार रण पेटवले.
महासभा पार पडलेल्या बैठकीत महिला व बालकल्याणासाठी राखीव असलेले अधिकृत ५ टक्के बजेट नेमके गेले कुठे? असा थेट सवाल करताच प्रशासनात गोंधळ उडाला. उत्तर देताना अधिकाऱ्यांची झालेली तारांबळ आणि सत्ताधाऱ्यांची कोंडी स्पष्ट दिसून आली.
प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता न आल्याने अखेर सत्ताधाऱ्यांनी तब्बल १५ मिनिटांसाठी सभा तहकूब केली. यानंतरही रागिणी यादव आक्रमकच राहिल्या. “हा निधी महिलांचा आणि बालकांचा हक्क आहे, तो कुठे गेला याचा हिशोब द्यावाच लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
अभ्यासू आणि तडफदार नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या रागिणी यादव यांनी महिला-बालकांच्या निधीच्या मुद्द्यावरून मनपा प्रशासनाला कठघऱ्यात उभे करत सभागृहात खऱ्या अर्थाने राजकीय तापमान वाढवले. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली असून या मुद्द्यावर पुढील राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.








