जिल्ह्यातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचीत राहू नये याची खबरदारी घ्यावी आ.संभाजी पाटील निलंगेकरांची प्रशासनाला सुचना

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – जिल्ह्यातील अतिवृष्टी, सतत पडणारा पाऊस त्याचबरोबर गोगलगाय व किड प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांची पिके धोक्यात आलेली आहेत. परिणामी अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली असतानाही शेतकर्‍यांच्या हातातून खरीपाचा हंगाम जाण्याची शक्यता आहे. शासनाने सदर परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे

करण्याचे आदेश दिलेले असून एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचीत राहू नये याची विशेष खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी सुचना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. निलंगा येथील पंचायत समितीच्या सभागृहात विभाग प्रमुखांच्या बैठकीत माजी मंत्री आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी

अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार सुरेश घोळवे, जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गवसाने, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते आदींसह विभाग प्रमुख व अधिकारी यांची उपस्थिती होती. शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सरकारने दिलेली असून सध्याच्या परिस्थितीमुळे बहुतांश शेतकरी मोठ्या

प्रमाणात अडचणीत आल्याचे पाहण्यास मिळत आहे, असे सांगून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी शेतकर्‍यांना या अडचणीत मदतीचा हात शासनाच्या वतीने पुढे करण्यात आल्याचे सांगितले. शासनाने शेतकर्‍यांना आवश्यक असणारी मदत मिळावी याकरीता पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. अतिवृष्टी, सततचा पडणारा पाऊस परिणामी गोगलगाय व किड

प्रादुर्भाव यामुळे शेतकर्‍यांना दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या हातातून खरीप हंगाम जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचीत राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरादरी घ्यावी अशी सुचना आ. निलंगेकर यांनी यावेळी केली. कृषी विभाग आणि महसुल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून सरसकट

शेतकर्‍यांना मदत मिळावी या दृष्टीने आवश्यक असणारा अहवाल आणि प्रस्ताव प्रशासनाने तात्काळ शासनाकडे सादर करावा असे सांगून हा प्रस्ताव शासनदरबारी मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आपण करू अशी ग्वाही माजी मंत्री आ. निलंगेकरांनी यावेळी दिली. मात्र यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई करू नये असेही सांगितले. शासनाकडून मिळणार्‍या

नुकसारपाईसोबतच पिकविमा कंपनीकडूनही शेतकर्‍यांना कशा पद्धतीने मदत मिळेल याकरीता कृषी विभाग आणि महसुल विभागाने एकत्रीत बैठक घेऊन पिकविमा कंपनीला याबाबत आवश्यक असणार्‍या सुचनाही द्याव्यात असे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी या बैठकीत सांगितले. पिकविमा कंपनीकडून मदत मिळावी याकरीता शासनस्तरावर आवश्यक असणारा पाठपुरावा आणि

त्याकरीता विमा कंपन्यांना आवश्यक असणारे निर्देश देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू असे सांगितले. सध्याच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. आगामी काळातही मोठ्या प्रमाणता पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जलाशयात पाणीसाठा

वाढण्याची शक्याता आहे. मागील काळातील अनुभव लक्षात घेता जलाशयातील अतिरिक्त होणारा पाणीसाठा वेळोवेळी सोडण्यात यावा जेणेकरून शेतकर्‍यांना पुन्हा एकदा संकटाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. याबाबत प्रशासनाने वेळावेळी आढवा घेऊन गरज पडल्यास तात्काळ पाणी सोडण्याच्या सुचनाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिल्या.

Recent Posts