लातूर जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसापासून सूर्यदर्शन झालेले नाही. सातत्यानं संतंतधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नुकतीच पेरणी झालेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी पडझड किंवा दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लातूर जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी. तसेच पाणी साचलेल्या भागात पाहणी करुन नुकसानीचे

तत्काळ पंचनामे करावेत अशा सूचना माजी पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. तसेच गोगलगायच्या प्रादुर्भावामुळं सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत माहिती घेऊन त्याचे पंचनामे करावेत अशी सूचनाही अमित देशमुख यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्याशी

जिल्ह्यातील सद्य परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यांच्याकडून आढावा घेतला, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्याची सूचना केली. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही याप्रसंगी केल्या आहेत. सद्या पडणारा पाऊस जोराचा नसला तरी काल दिवसभरात काही ठिकाणी 39 ते 80 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळं नदी-नाले प्रवाही झाले आहेत.

पाऊस असाच चालू राहिला तर पूर परिस्थिती उद्भवू शकते ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कोणतेही धरण भरलेले नसल्यामुळं तेथून विसर्ग करण्यासारखी परिस्थिती नाही. खरीप पिकाचे अद्याप नुकसान झाले नसले तरी महसूल यंत्रणेने याबाबत आवश्यकतेनुसार पंचनामे करुन माहिती जमा करावी अशा सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Recent Posts