राज्यातील शालीन आणि सुसंस्कृत युवानेतृत्व म्हणजे अमित विलासराव देशमुख

महाराष्ट्र खाकी (लातूर) – राजकीय वारसा लाभला असल्यामुळे राजकारणात सहजगत्या प्रस्थापित होण्याची संधी असतानाही प्रदीर्घ काळ जवळपास 10 वर्षे रांगेत थांबून स्वकर्तृत्वाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारे महाराष्ट्राच्या राजपटलावरील शालीन आणि सुसंस्कृत युवानेतृत्व म्हणजे राज्याचे वैदयकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री  ना. अमित विलासराव देशमुख हे होय. नव्या पिढीतल्या या नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना उदंड दीर्घायुरारोग्य लाभो ही मनोमन शुभेच्छा…!

नेतृत्व लादले जाऊ नये हे लोकशाहीचे तत्तव असल्यामुळे राजकारणातील घराणेशाहीवर नेहमीच टीका होताना दिसते; परंतु लादलेले नेतृत्व जास्त काळ टिकत नाही हा अनुभव येत असल्याने घराणेशाहीसंदर्भातील चर्चा होणे आता जवळपास बंद झालेले आहे. राजकारणात नव्हे तर उदयोग, व्यवसाय किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो तेथे टिकायचे आणि पुढे जायचे असेल तर त्यासाठी योग्यता अंगी असावीच लागते. शिवाय परिश्रम करण्याची तयारीही असावी लागते.

शांत, संयमी आणि धीरगंभीर स्वभाव असलेल्या ना. अमित विलासराव देशमुख यांनी मागच्या वीस वर्षांच्या वाटचालीतून समाजकारण आणि राजकीय क्षेत्रातील टिकून राहण्याची योग्यता सिध्द केली आहे.
प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या लोकसेवेचा वारसा ना. अमित विलासराव देशमुख यांना लाभला आहे. राजकीय क्षेत्रात स्वकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण केल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीला सुसंगत असलेला नवा आणि आधुनिक विचार अंगीकारून लोकसेवेचा वारसा पुढे घेऊन ते निघाले आहेत.

इतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाप्रमाणे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या शालीन नेतृत्वात काँग्रेसमध्ये नवी पिढी सक्रिय झाली आहे. या पिढीचे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुण राजकारण्यांपैकी ना. अमित विलासराव देशमुख हे एक युवक नेते आहेत.

जबाबदारीची जाणीव
केवळ राजकीय वारसा आहे नव्हे तर या वारसाबरोबर आलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणारे हे युवानेतृत्व आपले नाव लिहिताना अमित विलासराव देशमुख असे संपूर्ण नाव जाणीवपूर्वक लिहितात. माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी समाजकारणासाठी राजकारण केले. त्यामुळेच ते लोकनेते म्हणून अजरामर झाले आहेत. त्यांच्या नावाबरोबर आलेला समाजकारणाचा वारसा ना. अमित विलासराव देशमुख तेवढयाच तन्मयतेने जपताना दिसत आहेत.

अगोदर शिक्षण मग राजकारण
राजकारणी परिवार आणि मोठे वलय असले तरी संस्कारात कुठलीही कमतरता न राहिलेल्या युवानेतृत्वाने शिक्षण घेण्याच्या वयात इतर कोणताही विचार न करता इंजिनीअरिंगचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात शिक्षित पिढी राजकारणात यायला हवी हा मतप्रवाह चर्चेत आला होता. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम त्यासंबंधाने आग्रहाने बोलत असत.

काळाची गरज लक्षात घेऊन ना. अमित विलासराव देशमुख यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकीय जीवनात विचारांती प्रवेश केला. त्यासाठी त्यांना कुणीही आग्रह केला नव्हता किंवा त्यांचे नेतृत्व लादण्याचे प्रयत्नही झाले नाहीत. समाजकारणाचा वसा पुढे चालवायला हवा, कुटुंबाकडून व्यक्त होत असलेल्या अपेक्षाची पूर्तता करता यावी हा उददेश ठेवून त्यांनी सारासार विचार करून राजकारणात येण्याचा निर्णय केला. राजकारणात येण्याचा निर्णय सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी लगेच नियोजनबध्द प्रयत्नही सुरू केले.

आश्वासनांची पूर्तता
सन 1998-99 दरम्यान विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्याच्या निमित्ताने त्यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनाशी संपर्क आला. लातूर विधानसभा मतदारसंघात फिरत असताना त्यानी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे अभिवचन त्यांनी या वेळी दिले. यानिमित्ताने युवा वर्गाचे मोठे संघटन त्यांनी निर्माण केले.

परिणामी लातूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे मोठे अनुकूल वातावरण तयार होऊन आदरणीय विलासराव देशमुख एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्रीही बनले. संपूर्ण राज्याचा कारभार सांभाळण्यात ते व्यस्त झाले तेव्हा लातूर मतदारसंघात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी ना. अमित विलासराव देशमुख यांच्यावर येऊन पडली आणि त्यांनी ती पूर्ण क्षमतेने पार पाडली. आजही त्याच पध्दतीने त्यांचे कार्य सुरू आहे.

साखर कारखानदारीतून समृध्दी
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातही सहकारी साखर कारखाने यशस्वी करण्याचा प्रयोग विलासराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याच्या उभारणीतून चालविला होता, त्यांचा तो प्रयोग यशस्वी तर झालाच शिवाय पुढे तो देशासाठी एक आदर्श ठरला आहे. मांजरा कारखान्याच्या यशस्वी उभारणीतून लातूर परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली. त्यातून 1988-99 च्या दरम्यान अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झाली होती.

नुकतेच केमिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांशी हितगूज करीत असताना सदरील समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. केवळ निर्धार करून न थांबता सरासरी 25 वर्षे वयाच्या तरुण सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी अवघ्या ९ महिन्यांत विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. या कारखान्याने आजवर 50 पेक्षा अधिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत.

सर्वांत कमी वयाच्या संचालक मंडळाने विक्रमी कमी वेळेत कारखाना उभा करून तो देशात आदर्श ठरावा अशा पध्दतीने यशस्वी रीत्या चालविला आहे. या कारखान्याने स्वफंडातून दुसरा कारखाना विकत घेतला असून तोही उत्कृष्ट रीत्या चालविण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वात आता टवेन्टिवन शुगर्स लि. चे युनिट 1 आणि युनिट 2  हे दोन कारखाने उभारले गेले असून ते उत्तम रीत्या सुरू आहेत. लातूरनजीक उभारल्या गेलेल्या टवेन्टिंवन शुगर युनिट 1 या कारखान्याचा मागच्या वर्षी चाचणी हंगाम पार पडला तर या वर्षी आतापर्यंत या कारखान्यात 8 लाख मे. टन पेक्षा अधिकच्या उसाचे गाळप झाले आहे.

जिल्हयात अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झालेली असताना परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना वरदान ठरतो आहे. एकंदरीत मांजरा परीवारातील आठ साखर कारखान्यांतून या वर्षीच्या गळीत हंगामात आतापर्यंत जवळपास 40 लाख मे. टन उसाचे गाळप झाले असून आणखी तेवढयाच मे. टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. आज या कारखान्यांनी प्रति टन 2200 रुपयांचा पहिला हप्ता शेतकरी व सभासदांना वाटप केला आहे. या माध्यमातून जीवनमान बदलण्याचा उददेश सार्थ ठरविण्यात येत आहे.

सामान्य कार्यकर्त्यांना संधी
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आपले कर्तृत्व फक्त साखर कारखान्याच्या मर्यादेत न ठेवता सन 1999 ते 2009 या 10 वर्षांच्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषि उत्पन्न बाजार समितीसह बँकिंग, शैक्षणिक, कृषी, सामाजिक,आणि सांस्कृतिक या सर्व क्षेंत्रात आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीचा ठसा उमटविला आहे.

या विविध संस्थांच्या निवडणुका लढवून नव्या सहका-यांना काम करण्याची संधी प्राप्त् करून दिली. हे करीत असतांना सामान्यातील सामान्य परंतु योग्यता आणि क्षमता असलेल्या सहकाऱ्यांना संधी मिळाल्यामुळे येथील राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे.

या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर सन 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर मतदारसंघातून त्यांनी एकतर्फी विजय मिळविला. येथून पुढे आजवर त्यांची यशस्वी राजकीय घोडदौड सुरूच आहे. सन 2012 मध्ये केंद्रीय मंत्रिपदावर कार्यरत असताना आदरणीय विलासरावजी देशमुखसाहेब यांचे आकस्मिक निधन झाले. पितृछत्र हरपल्यानंतर मोठा आधार निखळलेला असताना या परिस्थितीला अत्यंत धीराने सामोरे जात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कुटुंबाचा सामाजिक आणि राजकीय वारसा ना. अमित विलासराव देशमुख यांनी पुढे सुरू ठेवला आहे.

सन 2014 सली त्यांना अल्प काळासाठी राज्यमंत्रिपद मिळाले, जेमतेम शंभर दिवसांच्या या कालावधीत  मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यानंतर लगेच आलेली विधानसभा निवडणूक जिंकून ते दुसऱ्यांदा आमदार झाले. राज्यात सत्तांतर झाल्यामुळे त्या पाच वर्षांत त्यांनी आमदार म्हणून मतदारसंघाबरोबरच राज्यातील जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक  त्यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा सहजगत्या निवडून येऊन विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे.  सोबतच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून लहान बंधू धिरज विलासराव देशमुख यांनी विक्रमी मताधिक्यांने विजय नोंदविला आहे, हे दोन सख्खे बंधू एकाच वेळी विधानसभेत निवडून जाण्याचा हा दुर्मिळ योग घडवून आणल्याबद्दल राज्याच्या राजकीय क्षेत्रात आजही  कुतुहलाने ना. अमित विलासराव देशमुख यांची चर्चा होताना दिसते आहे.

संधीचे सोने
या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांचे एकत्रित महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाले आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी ना. अमित विलासराव देशमुख यांना मिळाली आहे. सोबतीला लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची  जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.  या संधीचेही त्यांनी अल्पावधीत सोनं करून दाखविले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले, किमान समान कार्यक्रम निश्चित करून मंत्रिपदाचे वाटप करण्यात आले, सरकारने कामकाजाची धूमधडाक्यात सुरुवातही केली परंतु कोविड-19  या जागतिक संकटाने संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रालाही ग्रासले आहे. सरकारचे दोन वर्ष  कोविड रुग्णांवरील उपचार आणि लॉकडाऊनचा बंदोबस्त करण्यात गेले आहे. जेथे जास्त प्रगती तेथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हे सूत्र राहिल्याने या संकटाचा देशात सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

कोविड-19 प्रादुर्भाव काळात वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने जे काम केले आहे ते सर्वात चांगले उठून दिसले आहे. प्रतिकूल परिस्थितीला संधी समजून ना. अमित विलासराव देशमुख यांनी या काळात  जलदगतीने निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही त्याच गतीने केली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची तपासणी आणि उपचार या कार्यात  वैद्यकीय शिक्षण विभागाची चांगलीच मदत झाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन हे मुख्य कार्य असले तरी राज्यातील जनतेच्या अडचणीच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागाने कोविड-19 रुग्णांवरील उपचाराच्या कार्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.

कोविड रुग्णावरील उपचारासाठी  वैदयकीय शिक्षण विभागाचा पुढाकार
राज्यभरात कोविड रुग्णसंख्येत वाढ होऊन रुग्णालये कमी पडू लागली तेव्हा सर्व वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये कोविड डेडिकेटेड रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय ना. अमित विलासराव देशमुख यांनी घेतला. या रुग्णालयात सर्व सोयी-सुविधा असल्यामुळे विशेष करून गंभीर रुग्णांवर तत्परतेने उपचार करणे शक्य झाले. ऑक्सि जन, व्हेंटिलेटर तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचवून मृत्युदर कमी करण्यास वैद्यकीय महाविद्यालयांची मदत झाली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयात कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार तर झालेच शिवाय राज्यभरातील शासकीय रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल मनुष्यबळ पुरविण्याचे महत्त्वाचे कार्यही या विभागाने केले आहे. महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरांनी अहोरात्र परिश्रम घेऊन असंख्य रुग्णांचे प्राण वाचविले आहेत.
कोविड-19  चा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा संपूर्ण राज्यात यासंबंधीची तपासणी करणाऱ्या फक्त तीन ते चार प्रयोगशाळा होत्या. ना. अमित विलासराव देशमुख यांनी या संदर्भाने तातडीने निर्णय घेऊन अनेक प्रयोगशाळांना मान्यता दिली.

त्यामुळे शासकीय आणि खाजगी मिळून आज राज्यात प्रयोगशाळांची संख्या ही तब्बल 1000 पेक्षा अधिक झाली आहे. प्रयोगशाळांची संख्या वाढल्यामुळे रुग्णांचे वेळेत निदान होऊन त्यांना वेळेत उपचार मिळाले आहेत. वेळेत उपचार सुरू झाल्यानंतर रुग्ण दगावण्याची शक्यता फारच कमी राहते. त्यामुळे वाढलेल्या प्रयोगशाळांमुळे कोविड रुग्णांचा मृत्युदर कमी राहण्यास मदतच झाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत या रुग्णावर उपचार करण्याचे काम सुरू असताना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यावयाच्या हा प्रश्न निर्माण झाला होता.

परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर अनेक समस्या होत्या. त्यामुळे परीक्षाच घेऊ नयेत, असा दबाव वाढत होता परंतु परीक्षा न घेता डॉक्टरांना डिग्री देणे तेवढेच जोखमीचे होते त्यामुळे अशा कठीण स्थितीत या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा अवघड निर्णय ना. अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. प्रारंभी या निर्णयावर टीका झाली, विरोधही झाला परंतु आपल्या निर्णयावर ठाम राहात ना. अमित विलासराव देशमुख यांनी या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत यशस्वी रीत्या परीक्षा घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

प्रारंभी कटू आणि रिस्की वाटलेल्या या निर्णयाचे काँगेस पक्षाचे श्रेष्ठी तसेच महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन त्यांचे केले. शिवाय राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयाचे तोंडभरून जाहीर कौतुक केले आहे.

विद्यार्थी आणि पालकांनीही नंतर या परीक्षा घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेले हे सर्व डॉक्टर सध्याच्या कठीण स्थितीत रुग्णसेवेसाठी उपलब्ध झाले  आहेत.  वेळेचे बंधन न पाळता अहोरात्र रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या या निवासी डॉक्टरांचे मानधन वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही ना. अमित देशमुख यांनी याच काळात घेतला आहे.

वैदयकीय शिक्षण प्रवेशात मागास विभागांना न्याय
वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्रात प्रचलित असलेली आणि प्रादेशिक असमतोल वाढविणारी  70/30 ची कोटा पद्धत रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय ना. अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात घेतला. मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यावरील अन्याय या निर्णयामुळे दूर झाला आहे  हे जरी खरे असले तरी तसे उघडपणे जाणवू न देता गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठीच हा निर्णय झाल्याचे भासविण्यात ना. अमित विलासराव देशमुख यशस्वी झाले आहेत. विधानसभेत या विषयावर निवेदन करताना “वन मेरीट वन महाराष्ट्र” हा उद्देश समोर ठेवून सदरील निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे त्या निर्णयास विरोध करण्यास  कोणी धजावले नाही.

जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय
कोविड-19 प्रादुर्भावाच्या  काळात वैद्यकीय महाविद्यालयातून मिळालेले उपचार लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. या मागणीचा विचार करता ‘जिल्हा तेथे शासकीय महाविद्यालय’ सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी घेतला असून या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात रायगड, सिधुदुर्ग, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी येथे नव्याने वैदयकीय महाविदयालय सुरू होत आहे.

नासिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठात पदवीत्तर शिक्षणाबरोबरच संशोधन संकुले उभारण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे विदयापीठ परिपूर्ण होणार आहे. यामूळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीबरोबरच राज्यातील डॉक्टरांची संख्या वाढून सर्वसामान्य जनतेला जलद गतीने माफक दरात उपचार मिळणार आहेत.

कलाकारांकडून सांस्कृतिक कार्य विभागाचे कौतुक
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडे असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामकाजावर फोकस राहिला असला तरी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या कामाकडेही त्यांनी कधी दुर्लक्ष केलेले नाही. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे चित्रपट तसेच मालिकांच्या चित्रीकरणावर तसेच चित्रपटगृहे आणि नाट्यगृहातील प्रयोगावर निर्बंध आले होते. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

कलाकार तसेच वृद्ध कलाकारांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी ना. देशमुख यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. चित्रीकरणासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे तसेच त्यासाठी परवानगी देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचबरोबर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू व्हावीत म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करतानाही योग्य त्या कलाकारांची पुरस्कारांसाठी निवड व्हावी याची दक्षता त्यांनी घेतली आहे.

कोविड प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू झाल्यानंतर दोन वर्षांत सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नाहीत. या परिस्थितीत असंख्य कलावंत अडचणीत सापडले त्यांना मदतीचा हात देण्यासाठी जवळपास 40 कोटी रुपयाची मदत या विभागामार्फत मिळवून देण्यात आली असून त्याचे वाटप सुरू आहे. त्यांच्या या कार्याबददल कलावंत मंडळींमधून सध्या कौतुक होताना दिसत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटी रुपये निधी मंजूर करून घेण्यात आला आहे.

राज्यातील चित्रपटनिर्मिती व्यवसाय जगात नावाजलेला आहे. या व्यवसायाला उदयोगाचा दर्जा मिळवून देऊन् त्यांची आणखी भरभराट करण्याचे नियोजन ना. देशमुख यांनी आखले आहे. या क्षेत्रात जगातील अदययावत तंत्रज्ञान वापरले जावे म्हणूनही त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलणी सुरू केली आहे.

नवे सांस्कृतिक धोरण येणार
राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवून अनेक वर्षे उलटून गेली आहेत. दरम्यानच्या काळात या क्षेत्रात अनेक बदल घडले आहेत. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन या विभागामार्फत सुधारित सांस्कृतिक धोरण आखण्याचा निर्धार आता ना. अमित विलासराव देशमुख यांनी केला असून त्या दृष्टीने त्यांनी नियोजनही केले आहे. त्यासाठी समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी नुकतीच केली आहे.

पालकत्व निभावले
कोविड-19 च्या प्रादुर्भाव  काळात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. अमित विलासराव देशमुख यांनी निभावलेली भूमिका तर संस्मरणीयच ठरली आहे. दोन वर्षांच्या काळात जास्तीत जास्त वेळ लातूर येथे थांबून त्यांनी रुग्णसंख्या वाढू नये, लागण झालेल्या रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी  राबविण्यात येत असलेल्या  उपाययोजनांवर त्यांनी बारकाईने  लक्ष ठेवले  आहे.

आदरणीय विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून लातूर येथे अगोदरच बांधून तयार  असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी ताब्यात घेऊन तेथे कोविड-19 डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्स इतर सोयी-सुविधा तातडीने उभारण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. लातूर येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेली सुसज्ज वसतिगृहे अधिग्रहित करून त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यासाठीही त्यानी सूचना दिल्या.

यासंबंधाने त्यांनी अनेक निर्णय तातडीने घेतल्यामुळे कोविड-19 रुग्णांवरील उपचार सुलभतेने होऊन मृत्यूचे प्रमाण नगण्य राहिले आहे. लातूर येथील कोविड-19 डेडिकेटेड रुग्णालय आणि कोविड-19 केअर सेंटर येथे मिळालेल्या सोयी-सुविधांचे तर राज्यभर कौतुक झाले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी पोहोचविणे,  जिल्ह्यातील 22 लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पुरविणे, शेतीमालाची वाहतूक आणि विक्री निर्धोकपणे होईल याची काळजी घेणे या सर्व बाबींवर पालकमंत्री म्हणून त्यांनी बारकाईने लक्ष दिले,

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड-19 ची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला आपल्या कार्यातून फोन करून त्याची विचारपूस करण्याचे काम पालकमंत्री म्हणून ना. अमित विलासराव देशमुख यांच्यामार्फत  दररोज सुरू होते. यात अडचण सांगणाऱ्या रुग्णाला आवश्यक ती मदत तातडीने पोहोचविण्याची दक्षता त्यांच्याकडून  घेतली जात असे. कठीण काळात मदतीला धावून जाणे हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे कार्य असते हे काम अविरतपणे करणारे ना. अमित विलासराव देशमुख यांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा…!  त्यांच्या माध्यमातून जनहिताचे कार्य असेच अविरत घडत राहो ही सदिच्छा!

वैद्यकीय शिक्षण व संस्कृतीक मंत्री अमित देशमुख
जनसंपर्क अधिकारी (लातूर)
श्री. पांडुरंग कोळगे
                           

Recent Posts