महाराष्ट्र

रुग्णालयापेक्षाही रस्ता अपघातातील जखमींना तात्काळ मदत करून जीवनदान देणे शक्य : अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – रुग्णालयात उपचारादरम्यान अनेक रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य आहे. मात्र रस्ता अपघातातील जखमींना तात्काळ आवश्यक ती मदत करून त्यांना जीवनदान देणे हे त्यापेक्षाही महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले. लातूर जिल्हा अस्थिरोग संघटनेच्या वतीने दि.

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान सुरक्षित जीवन – सुरक्षित सांधे सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सप्ताहाच्या समारोपादिवशी म्हणजे रविवारी, 7 ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ब्लू लेक्चर हॉलमध्ये लातूर शहरातील पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी लातूर जिल्हा अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष

डॉ. द्वारकादास तापडिया, डॉ.अशोक पोद्दार, आयएमए चे सचिव डॉ. मुकुंद भिसे, अस्थिरोग संघटनेचे सचिव डॉ.शशिकांत कुकाळे , पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, भूल तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय अस्थिरोग संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी 4 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर अस्थि व सांधे आरोग्य दिन साजरा केला जातो. त्याचा

अनुषंगाने दि. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान विविध आरोग्य विषयक, सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून लातूर जिल्हा अस्थिरोग संघटनेच्या वतीने हा सप्ताह साजरा केला गेला. वर्ष 2022 मध्ये भारतीय अस्थिरोग संघटना प्रत्येकाने रस्ते अपघातातील एक जीव वाचवावा (each one Save one) हा उपक्रम थीम राबवणार आहे. भारतामध्ये

रस्त्यांवरील अपघातात जाणाऱ्या बळींची संख्या रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. वय 18 ते 45 वर्ष वयोगटाच्या तरुण रुग्णांचे अपघात ग्रस्त होण्याचे प्रमाण 69.3 टक्के आहे. 18 ते 60 या काम करणाऱ्या ग्रुप मधील लोकांचे अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण 84.3 टक्के इतके जास्त आहे. यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत , अपघातानंतर पहिल्या तासात

( गोल्डन आवर) मध्ये न मिळाल्यामुळे झालेले आहेत.
यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर योग्य प्रकारचे प्रथम उपचार दिल्यानंतर टाळता येऊ शकतात. परंतु,‌ सध्या अशा प्रकारच्या जीवन रक्षक प्रथमोपचार व मदतीच्या प्रशिक्षणाचा खूपच अभाव दिसून येतो. अशा प्रथमोपचारांचे प्रशिक्षण आपण अनेक तरुण, विद्यार्थी, पोलीस यांना सहजरीत्या देऊ शकतो. महाराष्ट्र अस्थिरोग

संघटनेच्या वतीने,‌असे जीवन रक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षण, राज्यभरातील हजारो विद्यार्थी पोलीस व तरुणांना देण्याचे ठरवण्यात आले आहे. लातूरमध्ये पार पडलेल्या या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना डॉ. सुधीर देशमुख यांनी कोणताही अपघात, दुर्घटना घडल्यानंतर उपलब्ध साधनांच्या सहाय्याने जखमींचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणे

आवश्यक असते. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे आपण समाजातील अनेक निष्पाप बळी जाण्यापासून वाचवू शकतो. अशा उपक्रमात समाजातील सर्वच घटकांनी सहभागी होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनीही यावेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. द्वारकादास तापडिया यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या उपक्रमाच्या

आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली. आभार प्रदर्शन डॉ. शशिकांत कुकाळे यांनी केले. या कार्यशाळेत भूलतज्ज्ञ डॉ. किरण तोडकर, डॉ. विनोद वाघमारे यांनीही प्रशिक्षण व प्रथमोपचाराविषयी मार्गदर्शन केले.

Most Popular

To Top