भाजप पळवत असलेल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांविषयी राज ठाकरे गप्प का ? – रविकांत वरपे

महाराष्ट्र खाकी ( पुणे ) – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरविण्यापेक्षा महाराष्ट्रातून गुजरात, दिल्लीला पळविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांविषयी आवाज उठविण्याचे धारिष्ट्य दाखवावे. महाराष्ट्रावर अन्याय करीत असलेल्या महाराष्ट्रद्वेषी भाजपच्या निर्णयावर राज ठाकरे गप्प का ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाच्या नावातील ‘महाराष्ट्र’

शब्द काढून टाकावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी राज ठाकरेंना दिले आहे. तसेच राज ठाकरे यांनी मराठी तरुण आणि महाराष्ट्र प्रेमाचा पुळका आणू नये, अशी टीकाही रविकांत वरपे यांनी केली. रविकांत वरपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की जो मुद्दा घेऊन राज ठाकरे यांनी

मनसेची स्थापना केली, तो मुद्दा सध्या त्यांच्या खिजगणतीतही नाही. आज महाराष्ट्रातून गुजरात आणि दिल्लीला केंद्रीय संस्था नेण्याचे भाजपचे कारस्थान सुरू आहे. मात्र, भाजपच्या वळचणीला गेलेल्या राज ठाकरेंना हे दिसत नाही. मनमोहनसिंग सरकारच्या काळात आतंरराष्ट्रीय वित्तीय-व्यापार सेवा केंद्राची उभारणी मुंबईत करण्याचे ठरले असतानाही 2014 मध्ये सत्तेत आल्या आल्या

भाजपने हा प्रकल्प गुजरातला पळवला. तसेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघर येथे नियोजित असताना हे प्रकल्प गुजरातमधील द्वारकेत उभारले जात आहेत. या अकादमी स्थापन करण्यामागे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची (26/11) पार्श्वभूमी होती. त्यासाठी पालघरमध्ये 305 एकर जागा ताब्यातही घेतली होती. पण केंद्रीय

गृह मंत्रालयाने अचानक दोन्ही प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे गेल्या चाळीस वर्षांपासून मुंबईत असलेली एअर इंडिया आणि ट्रेड मार्क पेटंट कार्यालये दिल्लीला हलविल्यात आली. एवढ्या सर्व महत्त्वाच्या केंद्रीय संस्था महाराष्ट्राबाहेर जात असताना राज ठाकरे का गप्प आहेत?

शिप ब्रेकिंग या मोठ्या स्वरूपाच्या व्यवसायासाठी बंदरांजवळ स्वतंत्र जागा दिलेली असते. पण मुंबईतील ही केंद्रे सोयीस्कररित्या गुजरातला हलविण्यात आली. मात्र, यावर एकदाही बोलण्याचे धाडस राज ठाकरे करू शकले नाहीत, त्यामुळे महाराष्ट्रावरील बेगडी प्रेमाचा त्यांनी आव आणू नये, असेही रविकांत वरपे यांनी सांगितले.

Recent Posts